Sunday, October 15, 2006

मित्राचं पत्र!

हा आठवडा तुफान मिक्स्ड गेला.
तुफान काम आणि तुफान बोअर.
सिऍटल ला आलो, आणि टी.व्ही. ही किती जीवनावश्यक वस्तू आहे याची जाणीव झाली! नेट वर दिवसच्या दिवस कसा जातो - पत्ता लागत नाही. पण नेटवर कंपल्सरी टाईमपास करावा म्हणजे बोरच.
डिस्को आणि आयोडेक्स एअरपोर्टवर घ्यायला आलेले. लही गार-गार वाटलं.....
ते म्हणे - पहिला वीकेंड, तुमची सामान लावायची गडबड असेल, आपण पुढच्या वीकेंडला भेटू. सामान तर अजुन पोहोचलं नव्हतं, म्हणुन मग आम्ही 'राम गोपाल वर्मा' (आमचा कॅसेटवाला - 'रामू' सारखा दिसतो म्हणुन इथुन पुढे तो रामू) च्या 'मयुरी' मधुन 'ओंकारा' आणुन पाहिला.
आवडला.
'सरत घोडोंपे लगाते है सेरोंपे नहीं....' - खलास.....
'ओंकारा'ने अपेक्षा खूपच वाढवुन ठेवलेल्या, पण आनंदाची गोष्ट म्हणजे त्याने अपेक्षा पूर्ण केल्या. अगदीच खोड काढायची तर विशाल ने 'हाय इंपॅक्ट' सॉंग्जवर थोडी अधिक मेहनत घ्यायला हवी.
टी. व्ही. नसल्याने मग 'कंपनी','दीवाना मुझसा नही' (!), आणि एकदाचा 'मुन्नाभाई' पाहिला. अभ्याने त्याच्या पोस्टवर त्याबद्दल लिहिलयच, त्यामुळे इथे उगीच जागा अडवत नाही.
पण आवडला.
भरभरके.

खरं तर एवढं मागच्या आठवड्यात लिहिलेलं, पण पोस्ट पूर्ण करायला वेळ मिळाला नाही.
मागच्या आठवड्यात वेळ नव्हता, तर या आठवड्यात विषय!
तरी नमुद केलंच पाहिजे ते म्हणजे -
शुक्रवारी संध्याकाळी घरी येताना माधुरी रामू कडुन 'कभी अलविदा ना केहना' आणि 'डोर' घेऊन आली. जनतेने शिव्या घातल्याने 'अलविदा...' चं धाडस बरेच दिवस केलं नव्हतं. 'डोर' बद्दल थोडं बरं वाचलं होतं, शिवाय कुकुनूर वगैरे... पण त्यालाही हात लावला नव्हता.

'अलविदा...' फालतु पिक्चर आहे हे माहिती होतं, पण आणलाय तर बघु म्हटलं.
हा आता फालतु होईल, मग होईल, करत वाट बघत राहिलो, आणि पिक्चर सुंदर संवाद, संवेदनशील हाताळणी वगैरे वगैरे च्या जोरावर चांगलाच 'इन्व्हॉल्व्ह' करत गेला! इतरांच्या वैयक्तिक मतांबद्दल आदर बाळगुनही - मला पिक्चर आवडला.
'डोर' बद्दल सांगायचं झालं तर - एवढा सुंदर पिक्चर मी बरेच दिवसात काय, बऱ्याच वर्षात पाह्यल्याचं आठवत नाही.
नितांत सुंदर.
वर्णनच करवत नाहिये.
नागेश कुकुनूर चे पाहिलेले सगळेच पिक्चर आवडले, पण हे प्रकरण काही वेगळंच आहे.
पाहिलाच पाहिजे असा चित्रपट.
मी कॅसेट विकत घेऊन संग्रही ठेवणार आहे. गुल पनाग ला आधी एकदा पाहिलं होतं, चांगली ऍक्ट्रेस आहे, पण आयेशा तकिया हे एक अफलातून प्रकरण आहे.... आणि श्रेयस तळपदे - वा, क्या बात है.....

शिफ्टिंग करताना राहुल चं एक पत्र सापडलं.
राहुल - सॉरी, तुला न विचारताच ते इथे पोस्ट करतोय. पण एका जुन्या पत्रांच्या पेटीत तुझं पत्र सापडलं आणि चार वर्ष लहान झालो. खरं तर कुठली गोष्ट 'मिस' करत हळवं वगैरे होत बसण्याचा माझा स्वभाव नाही, पण हे पत्र तुझी उणीव जाणवुन गेलं.
पत्रास उत्तर पाठवल्याचं लक्षात नाही, तू पत्रोत्तरासाठी पानभर 'पॉइंट्स' देऊनही!
त्यातला पहिला पॉइंट म्हणजे -
'तू मधे एका मैत्रिणीबद्दल लिहिलं होतं.
ते पेटलं कि विझून गेलं?'
हाहाहा - वाचून मौज वाटली! २००२, म्हणजे अजुन माधुरीला भेटलो नव्हतो, त्या काळतली कुणी मैत्रीणही आठवत नाही, म्हणजे नक्कीच विझून गेलं.....

२२ मार्च २००२,

डियर अभि,

आज महाशिवरात्र.
ताप आलाय.
दिवसभर घरातच बसून आहे.
त्यामुळे माझ्या घरात सर्वत्र शांतता.
ताप आला कि ते २-३ दिवस मी एखाद्या काळाच्या लहानशा बेटावर असतो.
शांत.
एकटा.
आगापीछा नसलेला.
या दिवसात घरातच थांबल्यामुळे खूप प्युअर वाटतं.
जगाच्या स्वार्थी उद्योगांपासून दूर. शांत.
पण हे २-३ दिवसच ठीक आहे. जगात असं अधांतरी राहून उपयोग नाही. कधी ना कधी प्रवाहात सामील व्हावंच लागतं.

आज शेजारच्या इमारतीभोवतालचं रान साफ केलं. छोटी-मोठी सगळी झाडं तोडून टाकली. काय उपयोगी, काय निरुपयोगी हे ठरवणारे आपण कोण? तरीही आपण ती जबाबदारी उगीचच आपल्या खांद्यावर घेतो. असंच एक ना अनेक.

तुला हे सगळं खूप स्लो (विलंबित ख्यालासारखं) वाटत असेल. पण आपण - आपल्या आत - आपलं भोवताल हेच सगळं असतं. फक्त आपण ते नीट बघत नाही सवड काढून. ज्याला स्वत:ची कंपनी बोर होत नाही त्याचं उत्तम चाललंय असं समजावं.

तू खूप फिरलास, खूप पाह्यलंस, आता कसं वाटतंय? यशस्वी झाल्यानंतर. मनासारखं?

इकडे सामाजिक चित्र खूप बोअर आहे. अयोध्येवरून परत पेटणार असं दिसतंय. वाजपेयी महंतांशी फक्त चर्चा करतायत. हे महंत पाहिले की थेट रामाच्या काळातले वाटतात. केव्हापासून आंघोळ राहिलिय त्यांची. असो.

अनंत सामंतांचं 'अविरत' वाचलं.
'त्रिमाकाली मादाम' पण वाचलं.
तू?
अविरत बद्दल थोडंसं -
'अविरत' एक हारलेली कादंबरी वाटते. भरकटलेली पण नाही म्हणणार. हारलेलीच. विराज लॉस्ट इन लाईफ वाटतो. फक्त सामंतांच्या जीवनावेगासाठी शेवटपर्यंत वाचली. तुला काय वाटलं होतं ते कळव. त्यामानानं त्रिमाकासी मादाम खूपच जमीनीवर आहे. आवेग कमी. पण रिऍलिटी आहे. अस्तित्ववाद वगैरे.

फोटो पाह्यले. आवडले.
तू खरंच विमान उडवलंस?

टेस्ट छान. माझा स्कोर ५६ आला.
पटलं बरचसं. खूपच.
पण हे लोक निगेटिव्ह पॉइंट्स डायरेक्ट सांगत नाहीत. धार खूप कमी करतात. नॉन-पॉझिटिव्ह म्हणता येईल.

संदीपची नविन कॅसेट आली - तरुणाई.
मिळली का? कुणी येणार असेल तर सांग. पाठवुन देईन. एक दिवाळी अंक पण पाठवायचाय. सेतुबंध. बरचसं ट्रान्सलेटेड मटेरिअल आहे. कथा आहेत. रेन-मॅन ची स्टोरी आहे. वाचताना तुझी आठवण आली. आता अशा भरभरून स्टोरीज सांगायला कोणी नाही.

आई-बाबा मजेत.
विद्याला मुलगी झाली. संदीपलाही मुलगी झाली.
बायको छान. आता कुठं सूर जुळायला लागलेत. (वादी-विसंवादी) म्हणजे अजुन जुळवणी चालूच आहे. बहराच्या प्रतिक्षेत आहे. आता कुठं पालवी फुटायला लागली आहे. खूप काळजी घेते माझी. त्यामानाने मीच अपुरा पडतो. तुला माहितिये माझी बेफिकिरी नडते.

तुटक-तुटक लिहितोय ना? सहज विचार येत नाहीत. त्यामुळे खूप गोष्टी अर्धवट होतात. काही उपाय?
कविता पण खूपच कमी. तुला पत्रात दरवेळी एक नविन द्यायची असं ठरवुयात.
आता ही एक...

जिवंत रहाशीलच तू कुठेतरी
या जगाच्या पाठीवर.
याबाबतीत झुरळानंतर
माणसाचाच नंबर लागतो.
पण मित्रा नुसतं जिवंत राहुन भागत नाही.
जिवंत असण्याची खूण सापडावी लागते.

काल रात्री आकाश पाह्यलंस?
नाही? परवा....तेरवा.....
गेल्या किती रात्री आकाशाकडे नजर लावून
शांत किंवा अस्वस्थ झालास?
तर ती एक जिवंत असण्याची खूण आहे.

रातराणी.... रातराणी म्हटल्यावर काय आठवतं?
मदमस्त गंधाळलेल्या
किती धुंद रात्री आठवतात?
तर ती ही एक जिवंत असण्याची खूण आहे.

पैसा.... हो मिळवला कि
नाव.... हो येतं कि छापून अधुनमधून पेपरात.
कविता.... हो बारा संग्रह छापून झाले.
एखादी कविता उराशी गच्च कवटाळून
मरावंसं वाटलं का कधी?
ती ही एक जिवंत असण्याची खूण आहे.

कवितेचं पुस्तक चाळतोस का अधुनमधून
त्यातल्या कवितांवर आपण केलेल्या खुणा
पाहतोस का कधी डोळे भरून?
मग एक मोठा श्वास घेऊन मिटतोस का पुस्तक
आणि सहन न होऊन वाचायला घेतोस का
आजच्या ताज्या घडामोडींचं वर्तमानपत्र
- ही मरायला टेकल्याची खूण आहे.

तेच पुस्तक चाळत चाळत कधी शेवटी-शेवटी पोचलास
आणि जाळीदार पिंपळपान पाहून हळुवार झालास
तर हाक दे....
मी अजुन तिथंच आहे....
तशीच.... तुझी वाट पहात!!

यावेळी एवढंच.

- राहुल.

ता.क. लवकर उत्तर लिही.
पत्र आणि कवितेवर प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

राहुल - पानभर 'पॉइंट्स' अजुन समोर आहेत, रेलेव्हंट आहेत (पहिला पॉइंट सोडून दॅट इज...), चार वर्ष पत्रोत्तराच्या दिरंगाईसाठी थाप तरी कुठली शोधणार? त्यामुळे आता 'ओल्ड फॅशन्ड' पत्रच लिहितो!

भेटुच....

6 comments:

  1. छान लिहिलयेस मामा.! खरंच टी.व्ही. ला खूपच मिस करतोयेस असं दिसतंय! तेव्हाच इतका हळवा वगैरे झालायेस! ;-) जस्ट जोकिंग..

    राहूलचं पत्र आणि त्यातली कविता ही मस्त आहे! चीअर्स!

    तुला 'अलविदा' आवडल्याच्या आश्चर्यासह करण जोहरच्या भवितव्याची मला वाटायला लागलेली काळजी जरा कमी झाली.. ;-) 'ओंकारा' आणि अजूनही बराचसा बॅकलॉग माझा बाकी आहे, पाहूयात केव्हां कॅच-अप करू शकेन ते?

    बाबा हलकटपणे भारतात दिवाळी साजरी करायला गेला आहे, मी काकूंना फोन करून सांगणार आहे, की माझ्यातर्फ़े त्याला गुपचूप एक मिठाची करंजी करून खाऊ घाला म्हणून.. ;-)

    ReplyDelete
  2. असे काही वाचले की उगाचच हुरहुर वाटू लागते आणि अचानक या देशात दूर, एकटे राहात असल्याची जाणिव होते. असो. छान लिहीलं आहे. असेच लिहित रहा.

    ReplyDelete
  3. sundar... tula rahul sarakha mitra ahe he kiti chan...
    achanak milalelya sutti cha plan tharala ka mag?

    ReplyDelete
  4. Mama, Hi!!

    Gharun lihitoy! Meethachi naahi pan "Meethi" karanji chaapat!! :-))

    Bhavane mast net gheun thevalaye. Broadband aahe. Aani ek special room. Sukh sukh mhantaat tey kaay asate ajun??

    Kiti tari divasanni PC samor aalaye aani to suddha broadband sah - sone pe suhaga.

    Mitrache patra chhan! NehamipramaNech. SagaLe lekh japuun thev mama - nantar tujhe ekhade pustak publish karuyaat!

    Baaki aata sutti lagalyasarakhe waaTayala laagalaye!

    Enjoying my holiday. Porgi khush aahe - tilaa roaz navin mama/kaka/aatya/mavshi/aaji/aajoba bhetat asataat!! Tila baghun te khush, tyana baghun ti khush aani porila sambhaLayache tension kaahi divasapurate kunitari anandane khandyawar ghetale mhanun me aani shub pan khush!!

    Baba.

    ReplyDelete
  5. anonymous, snehal - thanks for your replies. Its nice to read encouraging comments from people other than the 'usual suspects'!

    ReplyDelete
  6. छान आहे. असेच लिहित रहा.

    ReplyDelete